Ad will apear here
Next
करोनासंबंधी काही विचार
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन (सीडीसी) या अमेरिकेतील संस्थेने तयार केलेले करोना विषाणूची रचना दर्शविणारे चित्र

करोनाच्या साथीच्या अनुषंगाने काही विचार मांडणारा, ज्येष्ठ विज्ञानलेखक निरंजन घाटे यांचा हा लेख...
........
सध्या जगात करोना विषाणूजन्य रोगाची साथ पसरली आहे. त्या संबंधीच्या बातम्या ज्या पद्धतीने दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरून देण्यात येत आहेत त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरत चालले आहे. त्यामुळे इथे वृत्तपत्र वितरणावर बंदी घातली जाण्याच्या आधी वृत्तपत्रांमधून आलेली आकडेवारी देत आहे.

भारतात दर वर्षी चार लाख लोक विविध प्रकारच्या कर्करोगांना बळी पडतात, तर दर वर्षी आठ लाख लोक क्षयरोगाचे बळी ठरतात. जगात दर वर्षी हिपॅटायटीस-सी ह्या व्याधीची १७ कोटी लोकांना लागण होते आणि साडेतीन कोटी लोक त्या व्याधीला बळी पडतात. इबोलाने आफ्रिकेत थैमान मांडले तेव्हा मृतांची संख्या ६० लाखांहून अधिक होती.

सध्या करोनानं मरणाऱ्या लोकांत कॉकेशियन वंशाच्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. ह्याचं कारण जी मानवी शाखा युरोपमध्ये गेली ती परिस्थितीनुरूप बदलली. गोरा वर्ण, तांबडे केस ही त्यांची वैशिष्ट्ये ठरली. त्यांनी वेळोवेळी इतर वर्णांच्या लोकांना युरोपमध्ये येण्यापासून रोखले. ज्यूंना त्रास दिला. पंधराव्या शतकात स्पेनमधून मूरिश (इस्लामी) आणि ज्यूंना वेचून हाकलून दिले. ह्यामुळे तिथले जननिक आदान प्रदान थांबले.

चीनमध्येही तेच घडले. पंधराव्या शतकानंतर चीनने जगाशी संपर्क बंद केला. त्या आधीही चिनी लोकांचा जगाशी संपर्क नव्हताच. त्यामुळे चीनमध्येही जननिक आदान-प्रदान नव्हते. त्यामुळे त्यांच्यातही रोगप्रतिकारकशक्ती मर्यादित प्रमाणात राहिली. जगात इतरत्र त्या मानानं मोठ्या प्रमाणात जननिक आदान-प्रदान म्हणजे रोटी बेटी व्यवहार होत राहिले. माया संस्कृतीचा नाश अशाच प्रकारे जगाशी फटकून राहिल्यामुळं झाला, असं मानव शास्त्रज्ञ म्हणतात.

सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या रोगाची साथ येते, तेव्हा एखाद्या भूभागातील ४० ते ४५ टक्के लोकांना त्या रोगाची बाधा होते. त्यातील दोन ते तीन टक्के रुग्ण दगावतात. त्यातील ८० टक्क्यांपेक्षा थोडे जास्तच रुग्ण हे सहा वर्षांखालील किंवा साठ वर्षांवरील असतात. एकूण मृतांचं सरासरी वय सत्तरपेक्षा थोडं जास्तच असतं. ह्या सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर साडेसात अब्ज लोकसंख्येत दोन लाख जणांचा मृत्यू ह्याची टक्केवारी किती? भारताची लोकसंख्या एक अब्ज ३० कोटी असावी. त्यात दोन हजार मृत्यूसुद्धा झालेले नाहीत. नऊ हजारांहून थोडे अधिक रुग्ण बरे झाले आहेत. ‘पुण्यात आज दोन मृत्यू’ अशी ब्रेकिंग न्यूज देताना पुण्यात एकूण मृत्यू किती त्याचे आकडे कधीच सांगितले जात नाहीत. भारतात एकूण करोनाबाधितांमध्ये त्या करोना बाधितांचा आर्थिक स्तर कधी सांगितला जात नाही.

देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हात जोडून सामाजिक अंतर पाळा, चेहऱ्यावर आवरण असल्याशिवाय बाहेर पडू नका, उगीचच कामाशिवाय बाहेर पडू नका असं सांगत असताना जे तथाकथित सुशिक्षित घराबाहेर पडतात, त्यांना पकडून महिनाभर विलगीकरण कक्षात टाकायला हवं आणि मोठ्या रकमेचा दंड करावा, असं म्हणावंसं वाटतं. लॉकडाउन वाढवून काही साध्य होईल का, हाही प्रश्न आहेच. कारण लॉकडाउन उठवल्यावर मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर येतील आणि कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिल्यावर कुत्रं जसं उलटून चावतं, तशी परिस्थिती होईल.

इथे आणखी एक गोष्टही महत्त्वाची आहे, ती म्हणजे ‘हर्ड इम्युनिटी’. ही दोन प्रकारची असते. जननिक प्रतिक्षमता आणि जातीय प्रतिक्षमता म्हणजे जेनेटिक इम्युनिटी आणि स्पेसीज् इम्युनिटी. इम्युनिटी सिस्टीमला पारिभाषिक शब्द प्रतिक्षमन प्रणाली असा आहे. हर्ड इम्युनिटीला आपण सार्वजनिक प्रतिक्षमता म्हणजे रोगप्रतिकारशक्ती असं म्हणू शकतो.

जेनेटिक म्हणजे जननिक प्रतिक्षमता ही आनुवंशिक असते. प्रत्येक प्राण्याला त्याच्या आई-वडिलांकडून ती प्राप्त होते. कुठलीही व्यक्ती ही सर्व रोगांशी लढू शकत नाही. आनुवंशिकतेमुळे तिला काही रोगजंतूंशी सामना करता येतो. इतर रोगजंतूविरुद्धची प्रतिक्षमता तिला स्वत:च मिळवावी लागते.

प्राणीजातीची म्हणजे स्पेसीज हर्ड इम्युनिटी म्हणजे एखाद्या प्राणीजातीची प्रतिक्षमता. कुठल्याही प्राणीजातीतील सर्वच प्राण्यांमध्ये एखाद्या रोगाविरुद्ध लढण्याची क्षमता असत नाही, तर त्या प्राण्यांपैकी ५० ते ६० टक्के प्राण्यांतच ती असते. हे असे का आणि त्या प्रतिक्षमतेची साथीच्या रोगाविरुद्ध लढण्यात कशी मदत होते, हे कोडंच आहे. ते सुटेल असा त्या क्षेत्रातल्या संशोधकांना विश्वास वाटतो.

आपण साथीचे रोग पसरविणाऱ्या अनेक सूक्ष्मजीवांवर काही प्रमाणात मात केली, तरी हिवताप, क्षय आणि अल्सर या सूक्ष्मजीवांनी आपल्या प्रयत्नांना दाद दिलेली नाही. कुष्ठरोगावरही आपण मात करू शकलेलो नाही. विषाणूजन्य आजारांना तर आपण आळा घालू शकत नाही, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. हेलिकोबॅक्टर पायलोरी ह्या रोगजंतूंमुळे अल्सर होतो. सुमारे दीड लाख वर्षांपासून म्हणजे आपली मानवजात अस्तित्वात यायच्या आधीपासून अल्सर आपल्या पूर्वजांना सतावत आला आहे. हिवताप गेली किमान दहा हजार वर्षे माणसाला छळतो आहे.

माणूस सुमारे एक लाख २० हजार वर्षांपूर्वी कातडी गुंडाळून अंग झाकू लागला ही बाब पिसू आणि माणसाचा जननिक अभ्यास करून मानव शास्त्रज्ञांनी शोधून काढली. हे कसं शक्य झालं? परोपजीवी, मग ते कीटक असोत, सूक्ष्मजीव असोत किंवा विषाणू असोत त्यांच्यात आणि माणसामध्ये डीएनए आणि आरएनए रेणूंची देवाणघेवाण होते. माणसातील सहाच्या गुणसूत्रांवरील प्रथिन रेणूंचा अभ्यास करून हे स्पष्ट होते. मानवी उत्क्रांतीला ह्या देवाणघेवाणीचा हातभार लागला, असंही मानव शास्त्रज्ञ म्हणतात.

हिवतापाचं आणि मानवाचं साहचर्य असंच शोधून काढण्यात आलं. हिवतापाचं संक्रमण कसं होतं, हे शोधून काढलं गेलं त्याला शंभराहून अधिक वर्षे होऊन गेली. आजही भारतात आणि अमेरिकेतसुद्धा हिवतापानं मरणाऱ्यांची संख्या काही लाखात आहे. विषाणूजन्य आजारांत फ्ल्यूनं वेळोवेळी थैमान घातलं आहे. स्पॅनिश फ्ल्यूनं १९१८ साली दीड ते दोन कोटी लोकांना यमसदनास पाठवलं. १९५७च्या साथीनंही जगभर एक कोटीहून अधिक बळी घेतले. तेव्हा ‘ब्रेकिंग न्यूज’ हा प्रकार नसल्यामुळं फारसा गाजावाजा न होता, ह्या साथी आल्या आणि गेल्या.

हे सगळं अशासाठी सांगितलं, की जीवाणू, विषाणू, कीटक आणि इतरही जीवांवर आपण कधीच पूर्णपणे मात करू शकलेलो नाही. यातले बरेच परोपजीवी हे सतत उत्परिवर्तित होत असतात. प्रतिजैविकांना दाद न देणारे सूक्ष्मजीव आणि विषाणू बरेच आहेत, तर डीडीटी आणि इतर कीटकनाशकांना पचवणाऱ्या कीटकांची संख्याही कमी नाही, हे लक्षात घ्यायला हवं.

एखाद्या प्राणीजातीची संख्या जेवढी जास्त, तेवढा ह्या परोपजीवींना उत्परिवर्तित व्हायला वाव अधिक. त्यामुळेच माणसाला बाधणाऱ्या रोगकारकांचे प्रमाणही जास्त. करोनाचे आत्ताच उत्परिवर्तन (म्युटेशन) होऊन दहा प्रकार झाले आहेत. कुठल्या तरी वाहिनीने ह्यांना ब्रेकिंग न्यूजमध्ये ‘कोरोनाचे दशावतार’ असं म्हटलं. हे अवतार आणखीही वाढू शकतात हे लक्षात घ्यायला हवं. तसंच हे लक्षात ठेवून करोनाच्या साथीला तोंड द्यायला हवं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढून एकूण मानवी लोकसंख्येच्या सुमारे ३५ टक्के लोक ज्येष्ठ नागरिक आहेत. मीही त्यातलाच. यातले ८० टक्क्यांहून अधिक लोक एक तर अकार्यक्षम आहेत किंवा कसलाही उद्योग नसलेले आहेत. त्यांच्या वैद्यकीय खर्चाचा भार दुसऱ्यावर असतो.

दुसऱ्या टोकाला अज्ञान वयाच्या आणि कायद्याने सज्ञान पण बेकार अशा व्यक्तींची संख्याही ३५ टक्के एवढी आहे. साथीच्या रोगांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि सहा वर्षांखालील मुले मरण्याचे प्रमाण सुमारे ८० ते ८५ टक्के एवढे असते; पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. त्या काळी साथींच्या रोगांमुळे लोकसंख्या नियंत्रण होत असे. आता चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंब शहरातून दिसते. उपभोग संस्कृतीत बरेचदा आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकले जाते किंवा घराबाहेर हाकलून दिले जाते. अशा वेळी काही जणांना न्यायालयात जाऊन दाद मागता येते; पण बऱ्याच जणांना असं काही करता येतं हे माहीत नसतं.

ज्या तीस टक्के लोकांना उरलेले सत्तर टक्के पोसावे लागतात, त्यांचेही भवितव्य फारसे आशादायक नसते. मोठाल्या सदनिकांत किंवा बंगल्यात म्हातारा-म्हातारी दोघे किंवा काही वेळा एकटेच असतात. मुलं परदेशात असतात. काही वेळा ते गेलेत, हे दोन तीन दिवसांनी लक्षात येतं. ही परिस्थिती रोज वृत्तपत्रातून वाचायला मिळते. अशा परिस्थितीत साथीचे रोग परवडतात; असंच म्हणावं लागेल. त्यात अकार्यक्षम आणि अनिर्मितीक्षम लोक कमी होतील. ‘जातस्यहि ध्रुवो मृत्यु’ म्हणत वाढलेल्या भारतीय समाजात, असे लोक ‘औषधं जान्हवी तोयम्। वैद्यो नारायणो हरी॥‘ हे विसरून नव्वदीत डॉक्टरांना वारेमाप पैसा देऊन महागड्या शस्त्रक्रिया करून घेतात, हेही अनाकलनीय ठरते.

विल्यम रुडिमन यांच्या मते, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर साथीच्या रोगांनी थैमान मांडलं आणि त्यात मोठ्या संख्येनं माणसांचे बळी घेतले तेव्हा तेव्हा पृथ्वीच्या जलवायुमानावर (क्लायमेट) त्याचा परिणाम झाला. गेल्या दोन हजार वर्षांत अधूनमधून कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण एकदम सरासरीपेक्षा कमी झाले. ह्यासाठी नैसर्गिक कारणे जबाबदार असावीत असं मानण्यात येत होतं; पण जेव्हा मानवी लोकसंख्या रोगांच्या साथींमुळे मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली, तेव्हा तेव्हा शेती कमी प्रमाणात होऊ लागली. मोकळ्या पडलेल्या शेतजमिनींच्या जागी जंगलं वाढू लागली. जंगलं वाढल्यावर वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण कमी झाले. रुडिमननी अशी काही उदाहरणेही दिलेली आहेत.

इ. स. ५४०च्या सुमारास अनेक रोगांच्या साथींनी मानवी लोकसंख्या एकदम कमी झाली. त्याचप्रमाणे १४व्या शतकातही कॉलऱ्याच्या साथीनं मानवी लोकसंख्या कमी झाली. त्यातच आशियात चेंगीजखानानं मोठ्या प्रमाणावर नरसंहार केला. ह्यामुळे जगाची लोकसंख्या तीस ते पस्तीस टक्क्यांनी कमी झाली, असा अंदाज बांधता येतो. पंधराव्या-सोळाव्या शतकात युरोपीय लोकांनी अमेरिकेत नवे रोग नेले. त्यामुळे अमेरिकेच्या दोन्ही भूखंडांतील स्थानिकांची संख्या नव्वद टक्क्यांनी कमी झाली असावी. ह्या प्रत्येक वेळी त्या त्या भूभागात स्थानिक स्वरूपाची हिमयुगं अवतरली. एक प्रकारे पृथ्वीच्या वातावरणाचं संतुलन साधण्याचा हा निसर्गाचा प्रयत्न असावा, असं रुडिमन यांना वाटतं. त्यांच्या प्लॉज्‌, प्लेगज्‌ अँड पेट्रोलियम ह्या २००५ सालच्या ग्रंथात त्यांचे हे विचार विस्तृतपणे मांडण्यात आले आहेत.

ह्यासंबंधी कुणाला अधिक वाचन करायचे असेल तर ‘सायंटिफिक अमेरिकन’ ह्या मासिकाचे मानवी उत्क्रांतीसंबंधीचे खास विशेषांक वाचावेत. त्यातही गॅरी स्टिक्स यांचे लेख उल्लेखनीय आहेत. ‘ट्रेसेस ऑफ ए डिस्टंट पास्ट’ हा लेख ह्या संदर्भात विशेष माहितीप्रद आहे. तसेच ‘ब्लॅक डेथ’ या पुस्तकातही बरीच माहिती मिळते. ‘द प्लेग्‌ज’ हे साथीच्या रोगांसंबंधीचे ख्रिस्तोफर विक्सचे पुस्तकही ह्या संबंधीची बरीच माहिती देते.

युरोपातून कुणाकुणाला कसं आणि कधी हाकललं गेलं ह्याची माहिती ‘द वर्ल्डली गुड्‌स’ ह्या लिझा जार्डिनच्या पुस्तकात सविस्तर देण्यात आली आहे.

-  निरंजन घाटे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZQXCM
Similar Posts
विषाणू प्रसार आणि आपण : निरंजन घाटे सध्या करोना विषाणूच्या प्रसाराने साऱ्या जगाला वेठीला धरलं आहे. ही साथ अभूतपूर्व असली, तरी विषाणूचा प्रसार ही गोष्ट मात्र नवी नाही. विषाणूंचा प्रसार नेमका कसा होतो, ते किती जीवघेणे असतात, विषाणूंमुळे झालेल्या रोगप्रसाराबद्दल आतापर्यंत जगभरात नोंदवली गेलेली निरीक्षणं काय आहेत, माणूस पुढारलेला असला, तरी
आयुर्वेदाच्या साह्याने वाढवा करोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती! सद्यस्थितीत करोनाची भीती प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यासाठी अपुरी पडणारी वैद्यकीय यंत्रणा यामुळे स्वतः निरोगी राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे, याव्यतिरिक्त सामान्य माणसाच्या हातात काहीही नाही. या परिस्थितीत पथ्यपालन व स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढविणे हे दोनच प्रकार शक्य आहेत
करोना विषाणूबद्दलचे सहा गैरसमज आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली वस्तुस्थिती (मराठी व्हिडिओ) करोना विषाणूबद्दलचे सहा गैरसमज आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली वस्तुस्थिती याचा व्हिडिओ (मराठी सबटायटल्ससह) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
करोनानंतर संभाव्य महामारींच्या प्रतिकारासाठी आपण ‘या’ जबाबदाऱ्या घेणार का? गेले सुमारे आठ-नऊ महिने आपण सतत ‘करोना’ महामारीच्या दडपणाखाली वावरत आहोत. या महामारीची तीव्रता आता कमी होत असली, तरी अद्याप तिचा पूर्ण बीमोड झालेला नाही. ‘आयुर्वेद’ आणि ‘योग’ या आपल्या अस्सल भारतीय चिकित्सा पद्धती सोडल्या, तर अन्य सर्व चिकित्सा पद्धतींच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्या दृष्टीने यापुढील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language